आगामी साहित्य संमेलनाचे ५० लक्ष रु. अर्थसहाय्य अ.भा. साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा
मुंबई, दि. 2/7/2019 : उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने दरवर्षीप्रमाणे रुपये ५० लाख इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे. मंजूर करण्यात आलेले अर्थसाहाय्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ३० जुलै, २०१९ रोजीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
आगामी काळात होणारी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि आचारसंहितेचा संभाव्य कालावधी लक्षात घेऊन अ. भा. साहित्य महामंडळाला साहित्य संमेलनाच्या नियोजनात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. गेल्या ४ वर्षांपासून हे अनुदान विजयादशमी आधीच साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा करण्यात येते.