आंबेडकर जयंती कुटुंबियांसह घरीच साजरी करावी
पुणे 13/04/2020 : जगभर कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. पुण्यासह राज्यात आणि देशात कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या काळात गर्दी करून कोरोनाला पोषक वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी यंदा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कुटुंबियांसह घरच्याघरी साजरी करत अभिवादन करावे, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्या वतीने आंबेडकरी जनतेला करण्यात आले आहे.
बाळासाहेब जानराव म्हणाले, “कोरोनामुळे देशभरात भीतीचे वातावरण आहे. त्यातही महाराष्ट्रात आणि पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. राज्य सरकार आणि प्रशासन ही साथ आटोक्यात आणण्यासाठी मेहनत घेत आहे. अशावेळी गर्दी करून कोरोनाच्या नियंत्रणात आडकाठी होणार नाही, यासाठी ‘रिपाइं’ कायमच प्रयत्नशील आहे. काही दिवसांपूर्वी तबलिगी समाजाच्या मरकजमुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, तशी परस्थिती आंबेडकर जयंतीमुळे उद्भवू नये, या उद्देशाने जयंती साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी, विविध संस्था व संघटनानी शहरातील विविध ठिकाणच्या आंबेडकर पुतळ्याजवळ जमा होऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढू नयेत.”
काही दिवसांपूर्वी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर जयंती घरीच साजरी करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या असल्याचेही जानराव यांनी नमूद केले.