ओवेसी यांना महाराष्ट्राची वेस का ओलांडू दिली? सरकारने त्यांच्यावर कारवाई का केली नाही?
– विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा सरकारला सवाल .
मुंबई – दि.4 : ‘भारत माता की जय‘ या एकाच वाक्याने देशाचे नागरिकत्व ठरत असेल आणि संविधानिक पदावर असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे समर्थन देत असतील तर त्याची चर्चा सभागृहात झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेतेधनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली.
‘भारत माता की जय’ बोलणार नाही असे महाराष्ट्रात येऊन वक्तव्य करणाऱे ‘एमआयएम’ पक्षाचे अध्यक्ष असलेल्या असदुद्दीन ओवेसींवर सरकारने कारवाई का केली नाही? असा प्रश्न मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला. या विषयावर सभागृहात चर्चा व्हावी, यासाठी मुंडे यांनी २८९ चा प्रस्ताव दाखल केला. मात्र सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळला.
‘एमआयएमचे’ अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी गळ्यावर सुरा ठेवला तरी ‘भारत माता की जय बोलणार नाही’ या केलेल्या वक्तव्याने या वादाला सुरुवात झाली. ओवेसींनी महाराष्ट्रात येऊन असे वक्तव्य केले. भाजपचा सरकारचा ओवेसींच्या या वक्तव्याला विरोध होता तर ओवेसी यांना महाराष्ट्राची वेस का ओलांडू दिली?सरकारने त्यांच्यावर कारवाई का केली नाही ? असा सवाल त्यांनी सरकारला केला. एमआयएमने विषयाला सुरुवात करायची आणि भाजपने त्या विषयाचे राजकारण करायचे, असा प्रकार सुरू असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी विधान परिषद सभागृहात केला .